Monday, January 30, 2023

भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम

 

3. भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम

 

I) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. दिवाणी अदालत (नागरी कोर्ट) ची स्थापना  ___________  कडून झाली.

उत्तर : वॉरन हेस्टिंग्ज

2. पोलिस अधीक्षकाचे पद  ________  कडून निर्माण केले गेले.

उत्तर : लॉर्ड कॉर्नवॉलिस

3. बंगाल व बिहारमध्ये (कायमधारा) जमीनदारी पद्धती ________ मध्ये सुरु करण्यात आली.

उत्तर : 1793

4. अलेक्झांडर रीडने सुरू केलेली जमीन महसूल पद्धत ____________ होय.

उत्तर : रयतवारी पद्धत

5. भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती पुरस्कृत करणारा ब्रिटीश अधिकारी __________  होय.

उत्तर : वॉरन हेस्टींग्ज

6. ‘रेग्युलेटिंग अ‍ॅक्टची अंमलबजावणी __________या वर्षी झाली.

उत्तर : 1773

 

II). खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

1. ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या न्यायव्यवस्थेबद्दल चर्चा करून माहिती लिहा.

उत्तर : ब्रिटिशांनी भारतात टप्प्याटप्याने केंद्रीकृत न्यायव्यवस्था अंमलात आणली 

·        ब्रिटिशांनी ही व्यवस्था लागू करून मोंगलांची सत्ता मोडून काढली आणि भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.  

·        1772 मध्ये गव्हर्नर पदावर आलेल्या  वॉरन हेस्टींग्जने नवीन योजना अंमलात आणली.

·        या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रकारची न्यायालये असणे सक्तीचे होते.

·        ती म्हणजे - ‘दिवाणी अदालत’ व ‘फौजदारी अदालत’.

·        येथे हिंदूना हिंदू धर्मग्रंथानुसार व मुस्लीमांना शरीयतनुसार न्याय दिला जात असे.

·        गुन्हेगारी प्रकरणात सर्वांची चौकशी इस्लाम कायद्याप्रमाणे केली जात होती.

·        हळूहळू, फौजदारी न्यायालयांमध्ये ब्रिटिश कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्या.

·        ब्रिटिश कायदे अंमलात आणून गुन्हेगारी कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आले.

·        दिवाणी न्यायालये युरोपीय अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली आली.

·        फौजदारी न्यायालये काझींच्या नियंत्रणाखाली असली तरी ती युरोपीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कार्यरत होती.

 

2. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान पोलीस व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या?

उत्तर : पोलीस व्यवस्था :

·        अंतर्गत कायदे व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांचे   काम होते.

·        लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात प्रथमच  प्रभावी पोलीस यंत्रणा राबविली.

·        पोलीस अधीक्षक (Superitendent of Police) हे नवीन पद निर्माण केले.

·        प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक पोलीस ठाणी निर्माण केली

·        प्रत्येक ठाण्यावर ‘कोतवालाची’ नेमणूक केली.

·        प्रत्येक खेड्यात एका चौकीदाराची नेमणूक केली.

·        गावपातळीवरील चोरी, गुन्हे आणि इतर कायद्याच्या उल्लंघनासाठी ‘कोतवाल’ला जबाबदार ठरवण्यात आले.

·        1770 च्या भीषण दुष्काळामुळे कायदा व सुव्यवस्था डळमळीत झाली. म्हणून संपूर्ण पोलीस खाते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अंमलाखाली आणण्यात आले.

·        1781 मध्ये ब्रिटिश दंडाधिकारी नेमण्याची पद्धत सुरू झाली.

·        पोलीस अधिकारी या दंडाधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली कार्यरत असत.

·        1861 मध्ये स्वतंत्र भारतीय पोलीस कायदा अंमलात आणला गेला

·        1902 मध्ये पोलीस आयोगाने पोलीस अधिकार्‍यांच्या पदासाठी योग्य भारतीयांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली.

 

3. (कायमधारा) जमीनदारी पद्धतीने भारतीय शेतकऱ्यांना कर्जात जन्मण्यास कर्जात जगण्यास व कर्जातच मरण्यास कसे भाग पाडले. ते स्पष्ट करा.

उत्तर : लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये वार्षिक स्थिर महसूल निर्माण करण्यासाठी नवीन जमीन धोरण लागू केले. याला कायमधारा पद्धत म्हणतात. या व्यवस्थेनुसार जमीनदार हा जमिनीचा मालक झाला.

·        जमीनदार कराची रक्कम दरवर्षी ठराविक मुदतीत कंपनीकडे जमा करीत.

·        या पद्धतीमध्ये करवसुली करणाऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क देण्यात आले.

·        त्यांच्यामार्फत सरकारने निश्चित केलेली कराची रक्कम वसूल करण्याची व्यवस्था केली गेली.

·        हे जमीनदार शेतकऱ्यांकडून निश्चित केलेल्या करापेक्षा जादा रक्कम वसूल करीत आणि स्वतः ऐष आरामाचे, सुखाचे जीवन व्यतीत करीत.

·        यामुळे जमीनदार गबर झाले.

·        महापूर व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जर शेतकरी कर भरण्यास असमर्थ ठरले  तर त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क सरळ कंपनीकडे जात असे.

·        कंपनी व जमीनदार दोघांचाही फायदा होत असे परंतु शेतकरी मात्र पूर्णपणे जमीनदोस्त होत असे.

·        या प्रणालीने एक नवीन सामाजिक गट तयार केला ज्याने ब्रिटिशांना मदत केली.

·        शेतजमिनींमध्ये कामाच्या अनियमित संधींमुळे शेतकरी, शेतमजुरांचे हाल झाले.

·        त्यांचे शोषण झाले आणि त्यांना असुरक्षिततेचे जीवन जगावे लागले.

·      गरीब शेतकऱ्यांचे शोषण होऊन त्यांच्या यातनेत भर पडली मात्र सरकारी खजिन्यामध्ये पुरेसा पैसा येऊ लागला. त्यामुळेच, "भारतीय शेतकरी कर्जात जन्मत असत, कर्जातच रहात असत आणि ब्रिटिशांच्या जमीन कर धोरणामुळे कर्जातच मरत असत.’’ हे चार्ल्स मेटकॉफच्या मत पटते.

 

4. रयतवारी पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर : 1792  मध्ये अलेक्झांडर रीडने  रयतवारी पद्धतीची सुरूवात  बारामहल प्रांतात  केली.

·        1801 मध्ये थॉमस मन्रोने ही पद्धत मद्रास व म्हैसूर प्रांतात चालू ठेवली.

·        या पद्धतीत शेतकरी व कंपनीचा एकमेकांशी थेट संबंध आला.

·        जो जमीन कसत असे तोच जमिनीचा मालक म्हणून ओळखला जात असे.

·        उत्पादनाच्या पन्नास टक्के रक्कम मालकाला कराच्या स्वरूपात कंपनीला द्यावी लागे.

·        या जमीन महसूलाला 30 वर्षाची मुदत असे.

·        या मुदतीनंतर कर आकारणीमध्ये बदल केला जाऊ शकत असे.

·        लहान शेतकर्‍यांना जमिनीची मालकी दिली असली, तरी भरमसाठ जमीन कर आकारणीमुळे त्यांना ते परवडत नसे.

·        करवसुलीसाठी अधिकारी दंडात्मक कारवाई करीत.

·        जरी जास्त पीक पिकले नसले, पिके करपली तरी कर भरावाच लागे.

·        प्रसंगी कर भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढावे लागे.

·        कर्जाची रक्कम फेडता आली नाही तर त्यांना आपली जमीन विकावी लागे.  

·        या पद्धतीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असे.

 

5. ब्रिटिशांच्या जमीन महसूल पद्धतीचे परिणाम कोणते?

उत्तर : ब्रिटीश जमीन महसूल पद्धतीचे परिणाम :

1. शेतकऱ्यांचे शोषण करणारा जमीनदारांचा नवा वर्ग निर्माण झाला.

2. जमीनदारांच्या शोषणाला बळी पडलेले शेतकरी हळूहळू भूमिहीन झाले.

3. जमीन म्हणजे एक वस्तू समजली जाऊ लागली - जमिनी गहाण ठेवून कर्ज उपलब्ध होऊ लागले.

4. अनेक जमीनदारांना जमिनीचा कर भरण्यासाठी त्यांच्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या.

5. कृषी क्षेत्र हे इंग्लंडमधील कारखान्यांना लागणाऱ्या कच्या मालाचे उत्पादन करणारे व्यावसायिक क्षेत्र बनले.

6. सावकार लोक गबर झाले.

 

6. भारतामध्ये आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे झालेल्या परिणामांची माहिती लिहा.

उत्तर : भारतावर झालेले ब्रिटिश शिक्षण पद्धतीचे परिणाम :

1. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाबरोबरच आधुनिकता, निधर्मीपणा, लोकशाहीवृत्ती आणि विवेकबुद्धी जागृत झाली.

2. स्थानिक साहित्य व भाषांना उत्तेजन मिळाले. यामुळे सुशिक्षित वर्गात ऐक्याचे विचार निर्माण होण्यास मदत झाली.

3. नियतकालिकांचा उदय झाला. यामुळे सरकारी कामकाजाची व धोरणांची छाननी होऊ लागली आणि भारतीय लोक विविध विषयांवर आपली टीकात्मक मते व्यक्त करू लागले.

4. नवनवीन सामाजिक व धार्मिक चळवळी सुरू झाल्या.

5. जे.एस.मिल, रुसो आणि माँटेस्क्यूसारख्यांच्या थोर विचारांमुळे सुशिक्षित भारतीय तरूणांमध्ये नव्या विचारांची उत्पत्ती होवू लागली.

6. जगभरात सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळींचा प्रभाव भारतीयांवरही पडला.

7. भारतीयांमध्ये आपल्या थोर परंपरा समजून घेवून त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण झाली.  

अशा रीतीने ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे  नवीन विचार आणि सांस्कृतिक धारणा उदयास आली. ब्रिटीश शिक्षण व्यवस्थेमुळे पुरोगामी वृत्तीची भारतीयांची नवीन पिढी निर्माण झाली. भारतीय आधुनिक पिढी तयार झाली.

 

7. ‘रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट’ मधील तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतूदी –

1. या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी ब्रिटिश राजवटीत बंगाल, मद्रास व बाँबे अशा तीन प्रेसिडेन्सीज होत्या. या तिन्ही प्रेसिडेन्सीजमध्ये  स्वतंत्र राज्यकारभार चालत असे. रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट अंतर्गत बंगाल प्रेसिडेन्सीने इतर दोन प्रेसिडेंसींवर नियंत्रण मिळवले.

2. बंगालचा गव्हर्नर हा  तिन्ही प्रेसिडेन्सीजचा गव्हर्नर जनरल बनला.

3. गव्हर्नर जनरलला इतर दोघांवर निर्देश, नियंत्रण आणि देखरेख करण्याचे अधिकार देण्यात आले होते.

4. कंपनीच्या संचालक मंडळाच्या तसेच बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय  बाँबे व मद्रास प्रेसिडेन्सीज कोणावरही युद्ध घोषित करू शकत नव्हते किंवा शांतता करार करू शकत नव्हते. अगदीच आणिबाणीच्या परिस्थितीत स्वतंत्रपणे कार्य करण्याचा अधिकार त्यांना होता.

5. या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या मध्यवर्ती न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि तीन सामान्य न्यायाधीश होते.

अशारीतीने नावाप्रमाणेच कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे हेच या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट होय.

 

8. 1858 च्या भारत सरकारच्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतुदी :

1. ईस्ट इंडिया कंपनीची मान्यता रद्द करण्यात आली व भारत देशावर राणीचा राज्यकारभार सुरु झाला.

2. गव्हर्नर जनरल या हुद्दयाचे नाव बदलून त्याला ‘व्हाईसरॉय’ असे संबोधण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले.

3. ब्रिटीश सरकारमध्ये ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया’ (राज्यसचिव) नावाचे नवीन पद निर्माण करण्यात आले. सचिव हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा भाग होता आणि भारताचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली.

4 प्रशासनात सचिवांना मदत करण्यासाठी मदत करण्यासाठी 15 सदस्यांची एक भारतीय परिषद (Council of India) अस्तित्वात आली.

 

9. 1935 चा भारत सरकारचा कायदा म्हणजे भारतीय संविधानाचा मूळ पाया होय’ याचे समर्थन करा.

उत्तर : या कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा आधार म्हणून काम केले.

·        1928 मध्ये मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेला अहवाल या कायद्याच्या निर्मितीत महत्त्वाचा ठरला.

·        भारतीय राज्यघटनेतील बहुतांश तरतुदी या कायद्यावर आधारित आहेत.

·        या कायद्याने भारतीयांना पूर्णपणे जबाबदार सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली

·        हा कायदा भारतातील ब्रिटिश प्रांतापुरता मर्यादित नसून स्थानिक संस्थानांना पण तो लागू होणार होता 

·        ब्रिटीश शासित प्रदेश, स्थानिक संस्थाने व मांडलिक राज्ये मिळून भारतीय संघराज्याची कल्पना मांडण्यात आली.

·        भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. 

·        केंद्रात दुहेरी राज्यव्यवस्था (Dyarchy) स्थापन करण्यात आली.

·        प्रांतातील दोन गृहांचे सरकार रद्द करून त्यांना संपूर्ण स्वायत्तता देण्यात आली.

·        भारतात संघराज्य न्यायालय (Federal Court) स्थापन करण्यात आले.  

 

10. 1919 च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?

उत्तर : या कायद्यातील प्रमुख तरतुदी :

1. केंद्रात दोन गृहांचे सरकार (Bi cameral) स्थापण्याची पद्धत सुरू झाली त्यांना वरचे सभागृह व खालचे सभागृह असे म्हणतात.

2. प्रांतामध्ये पण केंद्राप्रमाणेच दोन गृहे निर्माण करण्यात आली.

3. भारतासाठी एका उच्चायुक्तांची नेमणूक करण्यात आली.

4. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्याची हमी देण्यात आली.

5.  प्रांतीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला.  

6. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन व युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ सुरु करण्यात आले.

 

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...