Sunday, May 19, 2019

भाऊराया


कवी परिचय : इतर लोकगीतांप्रमाणे याही लोकगीताचे कवी अज्ञात आहेत.

‘लोकगीत’ हे मराठी भाषेचं लेणं आहे. ही लोकगीते लोकांनी रचली आहेत. आपल्या उत्कट भावना साध्या सोप्या शब्दात विशेषत: स्त्रियांनी व्यक्त केल्या आहेत. आपापले संसार करताना जे मनोभावाने अनुभवले ते स्वाभाविकपणे या गीतात उमटले आहे. ज्यातून नागपंचमीची, गौरीची, मंगळागौरीची, दिवाळीची, भोंडल्याची, लग्नाची, माहेरच्या आठवणींची अशी अनेक लोकगीते जन्माला आली आहेत.

मूल्य : बंधुप्रेम
साहित्य प्रकार : लोकगीत
संदर्भ ग्रंथ : जुने पाठ्यपुस्तक
मध्यवर्ती कल्पना : या लोकगीतात भाऊबीजेच्या दिवशी बहीण आतुरतेने भावाची वाट पाहते आहे. तो येत नाही तेव्हा तिच्या मनात कोणते विचार येतात. ते या लोकगीतात मांडले आहेत.

स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. दादाला राग का आला असावा ?
उत्तर : बहिणीने लहानपणी भावाचा चावा घेतला होता त्यामुळे दादाला राग आला असावा.

2. दादा कसा येईल?
उत्तर : दादा सगळे अपराध पोटात घालून आपले प्रेम दाखवित धावत धावत आपल्या बहिणीकडे येईल.

3. भातुकली म्हणजे काय?
उत्तर : लहानपणी खेळला जाणारा खेळ, यात स्वयंपाक करतात. राग प्रेम सारे काही खोटे खोटे असते.


प्र. 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन-चार वाक्यात लिहा.

1. दादा न येण्याची कोणकोणती कारणे बहिणीच्या मनात येतात?
उत्तर : लहान असताना बहिणीने भावाला चावले होते तोच राग आज त्याने धरला असावा असे तिला वाटते.  लहानपणी तिच्या भातुकलीच्या खेळातील दाणे दादाने खाल्ले होते त्यामुळे बहीण त्यावेळी दादाला नको नको ते बोलली होती तेच आजही दादा मनात ठेवून असावा त्यामुळेच तो भाऊबीजेला आला नसावा असे बहिणीला वाटते.

2. भाऊ रागावणार नाही हे दाखविण्यास बहिणीने कोणकोणती उदाहरणे दिली आहेत ?
उत्तर : शीतलतेचे प्रतीक असलेला चंद्र कधी आग ओकत नाही. त्याचप्रमाणे शांत असलेला माझा भाऊ माझ्यावर कसा रागावेल? हरिणाच्या नाभीतील कस्तुरी ज्याप्रमाणे स्वत:चा सुवास सोडत नाही. तसाच माझा भाऊही माझ्यावर कधी संतापणार नाही. सोने ज्याप्रमाणे आपला मूळ गुणधर्म सोडत नाही. ते कधी कुजत नाही तसाच माझा भाऊ आपल्या बहिणीला कधीही अंतर देणार नाही तो रूसणार नाही. आकाश कधी आपला रंग बदलत नाही त्याप्रमाणेच धाकट्या बहिणीवर भाऊ कसा रागावेल. भाऊ रागावणार नाही हे दाखविण्यासाठी बहिणीने अशी वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.

प्र. 3. संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1. पाठच्या बहिणीवरीŸŸ। भाऊ कसा हो रूसेल
उत्तर : संदर्भ : सदर काव्यपंक्ती ‘भाऊराया’ या कवितेतून घेतली आहे. या लोकगीताचा कवी अज्ञात आहे. भाऊबीजेच्या प्रसंगी बहिणीने स्वत:च्या मनाची समजूत घालताना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : भाऊबीजेच्या दिवशी बहीण आतुरतेने भावाची वाट पाहते आहे. तो येत नाही तेव्हा तिच्या मनात नानाप्रकारचे विचार येतात. लहानपणी आपण त्याला दिलेल्या त्रासामुळेच तो येत नाही असे तिला वाटते आहे परंतु तिच आपल्या मनाची समजूत घालते की पाठच्या बहिणीवर भाऊ कसा रूसेल.


प्र. 4. रिकाम्या जागा भरा.

1. येई .................।  भाऊराया

2. पाठच्या .............Ÿ।  भाऊ कसा हो रूसेल

3. रंग ..............Ÿ।  आकाशाचा

उत्तरे : 1. धावत धावत  2. बहिणीवरी  3. का बदलेल

प्र. 5. जोड्या जुळवा 

1. भातुकली अ) सुवास
2. कस्तुरी ब) कुजणार नाही
3. बाळपणी क) आग ओकणार नाही
4. चंद्र ड) दाणे खाल्ले
5. सोने इ) चावा घेतला
उत्तर :
1. भातुकली अ) दाणे खाल्ले
2. कस्तुरी ब) सुवास
3. बाळपणी क) चावा घेतला
4. चंद्र ड) आग ओकणार नाही
5. सोने इ) कुजणार नाही


कवितेचा सारांश : 

‘भाऊराया’ हे लोकगीत आहे. आपल्या उत्कट भावना साध्या सोप्या शब्दात विशेषत: स्त्रियांनी अशा लोकगीतातून व्यक्त केल्या आहेत. आपापले संसार करताना जे मनोभावे अनुभवले ते स्वाभाविकपणे या गीतात उमटले आहे. याचप्रकारे भाऊबीजेच्यादिवशी बहिणीच्या मनात आलेले विचार भाऊराया या कवितेत आले आहेत.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण आतुरतेने भावाची वाट पाहते आहे. तो येत नाही तेव्हा तिच्या मनात नानाप्रकारचे विचार येतात. लहानपणी आपण त्याला दिलेल्या त्रासामुळेच तो आला नाही असे तिला वाटते आहे. परंतु त्यावेळी स्वत:च ती आपल्या मनाची समजूत घालत आहे. दादा बालपणी मी तुझा चावा घेतला त्याचा तुला आज राग आला काय? मी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळीत होते. त्या भातुकलीच्या खेळातील दाणे तू खाल्ले होतेस त्यावेळी मी तुला नको नको ते बोलले होते. तेच आज मनात धरून बसलास काय? छोट्यांनी केलेले अपराध, चुका या मोठ्यांनी आपल्या पोटात घालायच्या असतात. माझा भाऊही माझे हे सारे अपराध पोटात घालेल व मला क्षमा करून  धावत धावत माझ्याकडे येईल. पाठच्या बहिणीवर (धाकटी बहीण) हा मोठा भाऊ कसा रागावेल. चंद्र हा शीतलतेचे प्रतीक आहे. राग आला तरी  तो कधी आग ओकेल का? त्याप्रमाणेच माझा भाऊ माझ्यावर कसा रागावेल. हा भाऊराया पाठच्या बहिणीवर कसा संतापेल सांगा? असा प्रश्न ती करते. ज्याप्रमाणे हरिणाकडे असणारी कस्तुरी स्वत:चा सुवास कधी सोडेल का? त्याप्रमाणेच माझा भाऊ मला अंतर देणार नाही. काही झाले तरी सोने कधी कुजेल का? तसेच मी ज्याची बहीण आहे तो भाऊराया आपल्या पाठच्या बहिणीवर कसा रूसेल?  आकाशाचा रंग कधी बदललेला आहे का? त्याप्रमाणेच पाठच्या बहिणीवर भाऊ कधी रागावेल का? असे सांगून ती स्वत:च्या मनाची समजूत घालीत आहे.व आपल्या भाऊरायाची वाट पाहत आहे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024