Sunday, May 19, 2019

पोवाड्याचा पोवाडा


कवी परिचय :    



शाहीर राजू राऊत (पुरुषोत्तम ऊर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत)  (जन्म 27 मे 1963) हे एक उत्तम चित्रकार, शिल्पकार, चलत्चित्रकार आहेत. स्वत: पोवाड्याचे लेखन आणि गायन करतात. 1998 सालचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त. पहाडी आवाज व लयबद्ध गायनासाटी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून सादरीकरण झाले आहे. शिवाय अनेक नियतकालिकातूनही त्यांचे पोवाडे प्रसिद्ध झाले आहेत. ‘रायगडीचा सिंह छत्रपती’, महालक्ष्मी गौरव गीत त्या शिवाय बèयाच कवितांचे लेखन त्यांनी केले आहे.



मूल्य : साहित्य सौंदर्याची जाणीव
साहित्य प्रकार : शाहिरी (पोवाडा)
शब्दार्थ  
साज-अलंकार, दागिना, कोल्हापुरी साज प्रसिद्ध आहे; बाज-ठेवण, पद्धत; नाज-सौंदर्य, नजाकत; स्तब्ध-शांत; थवा-जमाव, समुदाय; लयबद्ध-विशिष्ट गतीने बांधलेले; तांडव-शंकराने केलेले रौद्र नृत्य (भीतीदायक); गांडीव-अर्जुनाच्या धनुष्याचे नाव; खांडव-एका वनाचे नाव, हे वन जाळून पांडवानी इंद्रप्रस्थ नगरी बसविली होती; वणवा-जंगलाला लागलेली आग; सिंहनाद-सिंहाची गर्जना; आबाद-सुख (भरपूर सुख); जोड-साथ, सोबत; वैश्विक धर्म-विश्वधर्म; दुष्कर्म-पाप; दुमदुमणे-घुमणे; गर्जना-आरोळी; सिंहरी-सिंहाची डरकाळी; धडकी-भीती; झार-एखादा सूर जास्तकाळ उमटत राहणे; तार-तुणतुण्याची तार; सस्ती-स्वस्त; काल-काळ; दिक्काल-दिशा आणि काळ; ढाचा-साचा, रूप, आकार; खोचा-अवघड जागा; भुत्या-गोंधळी (देवीचा पुजारी); किरपा-कृपा आशीर्वाद, दिधली-दिली; वधली-दूर केली; वदली-बोलली, म्हणाली.

टीपा :

1. पोवाडा - पराक्रमी वीराच्या शौर्याचे गीत म्हणजे पोवाडा.
2. शाहीर - लोकगीते गाणाèयाला शाहीर म्हणतात.

स्वाध्याय

प्र. 1. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर दिलेल्या जागेत लिहा.

1. शाहिरी हा लोककलेच्या कशातील साज आहे?
अ) पायातील ब) हातातील क) गळ्यातील ड) कानातील

2. शाहिरांचे लयबद्ध शब्द ऐकून कोणाचे थवे स्तब्ध राहतात?
अ) पक्ष्याचे ब) ढगाचे क) रसिकाचे ड) काजव्यांचे

3. पोवाड्याचा नाद कशाला आवर असे म्हणतो?
अ) दुष्कर्माला ब) विश्वधर्माला क) मानवधर्माला ड) मनाला

4. आज शाहिरी कलेची जागा कोठे आहे?
अ) घरात ब) दारात क) रस्त्यावर ड) चित्रपटात

5. आज हसणारा उद्या काय करणार आहे?
अ) नाचणार ब) रडणार क) झोपणार ड) पळणार

उत्तरे : 1. क) गळ्यातील  2. क) रसिकाचे   3. अ) दुष्कर्माला  4. क) रस्त्यावर  5. ब) रडणार

प्र. 2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. शाहीर राजू राऊत यांना ............... साली अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला.

2. पांडवानी ............... वन जाळून इंद्रप्रस्थ नगरी बसविली.

3. पोवाड्याची जोड ................ वैश्विक धर्माला आहे.

4. आदिमायेची कृपा ................ वर झाली.

उत्तरे : 1. 1998  2. खांडव  3. वैश्विक  4. शाहिरावर


प्र. 3. जोड्या जुळवा 

       अ      
1. धनुष्य अ) देवीचा पुजारी
2. सिंह ब) वन
3. खांडव क) टणत्कार
4. भुत्या ड) गर्जना
उत्तर :            अ      
1. धनुष्य अ) टणत्कार
2. सिंह ब) गर्जना
3. खांडव क) वन
4. भुत्या ड) देवीचा पुजारी

प्र. 4. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. लोककलेच्या गळ्यातील साज असे कोणत्या कलेला म्हटले आहे?
उत्तर : लोककलेच्या गळ्यातील साज असे शाहिरी कलेला म्हटले आहे.

2. कोणाचे शंख फुंकले?
उत्तर : पांडवांचे शंख फुंकले.

3. कोणत्या धर्माचे आचरण करावे असे कवीला वाटते?
उत्तर : वैश्विक धर्माचे आचरण मानव धर्माने करावे असे कवीला वाटते.

4. शाहीर कोठे गर्जतो?
उत्तर : शाहीर जनात गर्जतो.

5. आदिमायेने कशाचा वध केला आहे?
उत्तर : आदिमायेने मनाच्या चिंतेचा वध केला आहे.

प्र. 5. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. शाहिराने पोवाड्याचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर : शाहीर म्हणतो पोवाडा हा लोक कलेच्या गळ्यातील साज आहे. वीरकथा गाण्याचा खरा बाज म्हणजे पोवाडा आहे. याचा अंदाजच वेगळा आहे. याचा नखरा आणि नाज याचे वर्णन करता येईल तेवढे कमीच आहे. यातील लयबद्ध शब्द  ऐकून रसिकांचे थवे ही स्तब्ध राहतात. याचा नाद सिंहनाद घालतो. सर्वांना सुख देतो. याची जोड वैश्विक धर्माला आहे.

2. पोवाड्याच्या साथीला कोणकोणती वाद्ये असतात?
उत्तर : पोवाड्याच्या साथीला डफ, संबळ, तुणतुणे, ढोलकी इ. वाद्ये असतात.

प्र. 6. खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.

1. पोवाड्याची कोणकोणती वैशिष्ट्ये यात सांगितलेली आहेत?
उत्तर : पोवाडा हा लोककलेच्या गळ्यातील साज आहे. इतरांपेक्षा याचा अंदाज वेगळा आहे. वीरकथा  ही पोवाड्यातून गायली जावी असा पोवाड्याचा बाज आहे. यातील शब्द हे इतके लयबद्ध असतात की ऐकणारे रसिकांचे थवे ही स्तब्ध राहतात. पोवाड्याला वैश्विक धर्माची सोबत आहे.  दुष्कर्माला आवरण्याचे आवाहन पोवाडा करतो. तुणतुण्याच्या साथीने समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर प्रहार करण्याचे काम पोवाडा करीत असतो. याचा ढाचाच वाचताना तुम्हाला त्यातील खाचाखुणा लक्षात येतील कुठे यातील शब्द थंड दिसतील तरी कुठे ते उसळी मारून येताना दिसतील.

कवितेचा सारांश : 

पराक्रमी वीराच्या शौर्याचे गीत म्हणजे पोवाडा. येथे पोवाड्याची थोरवी गाताना  शाहीर म्हणतो पोवाडा हा लोक कलेच्या गळ्यातील साज आहे. वीरकथा गाण्याचा खरा बाज म्हणजे पोवाडा आहे. या पोवाड्याचा अंदाजच वेगळा आहे. याचा नखरा आणि नजाकतीचे वर्णन करता येईल तेवढे कमीच आहे. शाहीरांच्या पोवाड्यातील लयबद्ध शब्द  ऐकून रसिकांचे थवे ही स्तब्ध राहतात.यातील रचनाच अशी असतेे की यातून भगवान शंकराच्या तांडव नृत्याचा भास होतो.  अंतिम युद्धासाठी पांडवांनी  शंख फुंकले आहेत. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार यातून ऐकू येतो. इंद्रप्रस्थ नगरी वसविण्याठी खांडव वन जाळण्यासाठी जे वणवे पेटविण्यात आले होते. त्याचा भास या पोवाड्यातून आपणास जाणवतो. शाहिराचा आवाज म्हणजे जणू सिंहगर्जनाच असते परंतु ही गर्जना सर्वांना सुख देते. या पोवाड्याची जोड वैश्विक धर्माला आहे. म्हणून मनुष्याने या धर्माचे आचरण करावे असे सांगताना दुष्कर्माला आवर असे पोवाड्याचा नाद आम्हाला सांगतो.

सिंहगर्जना वनामध्ये घुमल्यामुळे सर्वांच्या उरामध्ये धडकी भरते. त्याप्रमाणेच शाहीर हा लोकांच्यात गर्जना करीत असतो त्याची ही शाहिरी म्हणजे जनातील सिंहगर्जनाच असते. तुणतुण्याच्या साथीवर त्याचा सूर दीर्घकाळ उमटत राहतो. आणि तो आपल्या पोवाड्यातून असत्यावर वार करीत असतो. तरीही आज या पोवाड्याची जागा रस्त्यावर आहे.  आज ही शाहिरी कला इतकी स्वस्त झाली आहे की तिची जागा रस्त्यावर आहे. परंतु तिची जागा इथे आहे म्हणजे तिला साधी कला समजू नका असे शाहीर म्हणतो. येणारा दिक्कालच (दिशा आणि काळ) आपल्याला सारे स्पष्ट करून दाखविल; असे घडलंय आणि घडणार असे सांगेल. कुणापासूनही कुणाचे अडणार नाही. आज जो हसत आहे. तो उद्या रडणार आहे. म्हणजे वेळ काळ नेहमीच बदलत असतो.  त्यामुळे याचा ढाचा तरी लक्षात घ्या, त्यातील खाचाखुणा कशा आहेत ते पाहा.  शब्दांची नजाकत कशी उभरते कशी थंडावते याचे दर्शन यातून घडते. ज्याप्रमाणे नवे पाणी असले की त्यात नवीन मासोळ्या पाहायला मिळतात.  त्याप्रमाणे प्रत्येकवेळी त्यांची प्रतिभा नवे रूप धारण करून येत असते. प्रवाहात ती उसळी मारून आपली प्रतिभा दाखवित असते. हे लेणं म्हणजे अंबेच देणे आहे आणि त्या भुत्याचा (देवीचा पुजारी ) याचं लेणं आहे. शाहिरावर आदिमायेची कृपा झाली आहे. त्यामुळेच भुत्याची जागा आदिमायेने शाहिराला दिली आहे. मनात असलेल्या चिंतेचा वध आदिमायेने केला आहे. त्यामुळे मायमराठी मुखातून वदली आहे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024