आंधळा पांगळा या भारूडाचा सारांश आपल्या शब्दात लिहा.
सारांश : दृष्टी असून आंधळा झालो. ज्यांनी आपंगले म्हणजे आपला म्हटले त्यापासून वेगळा झालो. माझे आईवडील माझ्या बाळा म्हणतात पण शेवटी काळाच्या हाती सोपवितात. हे सज्जनांनो तुम्हीच माझे आईवडील माझ्यावर दया करा. तुमच्या पाया पडून मी विनवितो. माझी इंद्रिये क्षणभर ही चालत नाहीत. मायेच्या मोहाने संसाराच्या फेèयात मी गुंतलो आहे. हे म्हणजे जणू इंगळाच्या शेजेवर अंथरूण घातले आहे. आता कशी झोप यायची ! कोण मला यातून निर्धारपूर्वक सोडवेल बरे ? मायबाप संतांनो तुम्ही उपकार करा. जगात जो जनीजनार्दन आहे. त्याच्या पायी डोके ठेवून मी प्रार्थना करतो. जनार्दनातील एकनाथ म्हणतात ही विनंती ऐका.सद्गुरुने दिलेले नाम घेत घेत प्रपंचाने आंधळा झालेला सत्संगाची आस ठेऊन कृपेची भीक मागत आहे. साधे भिक्षेकरी भीकेची कृपा मागत असतात पण ज्याच्या जीवाला तळमळ लागते त्याला गुरुकृपा हवी असते. त्यासाठी त्याचा प्रयास चालू असतो. प्रपंच हा विंचवांचा पलंग आहे त्यावर सुखाची झोप कशी येणार असे ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात. तोच दृष्टान्त नाथांनी येथे वापरलेला दिसतो. पण म्हणून काही विंचवा-इंगळ्यांच्या विषाच्या भीषणतेत उणेपण येत नाही. प्रपंच दु:खद तो दु:खदच. आई वडील सुद्धा मी, माझे म्हणतात. पण प्रसंग येताच टाकून देतात. नाकातोंडात पाणी चालले तेव्हा माकडीणीने पिलाला पायी घातले. प्रत्यक्ष जन्मदात्यांची ही अवस्था तर इतरांची कथा काय वर्णावी ? तशात सर्व ज्ञानेंद्रिये परमार्थांच्या या मार्गावर चालत नाहीत. कर्मेंद्रिय संसारातच गुंतून राहतात. अशावेळी अडचणींचे, दु:खाचे जे अफाट वारे सुटते त्याने प्रपंच्याची नाव डगमगू लागते, बिथरते. यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे रामरायाला बोलावणे हे आठवतही नाही. मग फितुरांनी पोखरलेला किल्ला लढविणाèया किल्लेदारसारखी जीवाची अवस्था होते. असे होऊ नये म्हणून संतांच्या पाया पडून सत्संगाची, कृपेची, उद्धाराची मागणी दृष्टांतातील हा अंध करीत आहेत. जनातच जनार्दन आहे आणि जनार्दन हा सद्गुरुही आहे. सद्गुरुत एकरूप झालेले एकनाथ म्हणतात या आंधळ्याची विनंती ऐका हो म्हणजेच तशी विनवणी करायला शिका ना हो (अवधारा) !
000000000000000000
No comments:
Post a Comment